Sunday, March 30, 2008

सोमनाथ भाग ४

८. तेराव्या शतकाच्या अखेरीला सोमनाथवर अल्लाउद्दिन खिलजीची स्वारी झाली. अल्लाउद्दिन व रजपूत राजघराण्यांचे अनेक झगडे झाले. राज्यविस्तारासाठी अनेकदा खिलजीने राजस्थानवर स्वा़ऱ्या केल्या. या स्वारीच्या वेळी खिलजी राजस्थानातून पुढे सौराष्ट्रावरही चालून आला. याही हल्ल्यामागचा मूळ हेतू धार्मिक नसून राजकीय होता असे लेखिकेचे मत आहे. मंदिर परिसराच्या उत्खननातून असे दिसून आले की यावेळीहि मंदिराचा फार विध्वंस झाला नाही. लुटालूट झाली असणारच व लढाया-चकमकींमध्ये प्राणहानिही झाली असणार यांत संशय नाही. देवळाचा वापर चालूच राहिला. मात्र १४व्या शतकाच्या मध्यावर एकदा देवळातील लिंग बदलण्यात आले. त्यानंतर औरंगजेबाच्या काळापर्यंत मंदिराला हानि पोचली नाही. औरंगजेबाने त्याच्या कारकीर्दीच्या अखेरच्या काळात आपल्या अधिकाऱ्यांना हे मंदिर पाडून टाकून तेथे मशीद बनव्ण्याचा आदेश दिला होता. मंदिर पूर्णपणे पाडले गेले नाही. मंदिरावर बसका घुमट व छोटे मनोरे चढवण्यात आले. मंदिरातील मूर्ति वा लिंग (बहुधा) इतरत्र हलवले गेले. मंदिराचा वापर बंद झाला पण मशीद म्हणूनहि त्याचा वापर सुरू झाला नाही. परिसरातच भूमिगत मंदिर बनले, त्याचीच नंतर अहिल्याबाई होळकर यांनी सुधारणा केली व ते अजूनही वापरात आहे. मूळ मंदिर तसेच पडून राहिले. पहिल्या दोन हल्ल्यांपेक्षां औरंगजेबाच्या सैन्याने मंदिराची खरी हानि केली म्हटले पाहिजे. ही परिस्थिति स्वातंत्र्य मिळेपर्यंत कायम होती.

No comments:

www.Blogwani.com
Locations of visitors to this page