Sunday, March 30, 2008

सोमनाथ भाग ४

८. तेराव्या शतकाच्या अखेरीला सोमनाथवर अल्लाउद्दिन खिलजीची स्वारी झाली. अल्लाउद्दिन व रजपूत राजघराण्यांचे अनेक झगडे झाले. राज्यविस्तारासाठी अनेकदा खिलजीने राजस्थानवर स्वा़ऱ्या केल्या. या स्वारीच्या वेळी खिलजी राजस्थानातून पुढे सौराष्ट्रावरही चालून आला. याही हल्ल्यामागचा मूळ हेतू धार्मिक नसून राजकीय होता असे लेखिकेचे मत आहे. मंदिर परिसराच्या उत्खननातून असे दिसून आले की यावेळीहि मंदिराचा फार विध्वंस झाला नाही. लुटालूट झाली असणारच व लढाया-चकमकींमध्ये प्राणहानिही झाली असणार यांत संशय नाही. देवळाचा वापर चालूच राहिला. मात्र १४व्या शतकाच्या मध्यावर एकदा देवळातील लिंग बदलण्यात आले. त्यानंतर औरंगजेबाच्या काळापर्यंत मंदिराला हानि पोचली नाही. औरंगजेबाने त्याच्या कारकीर्दीच्या अखेरच्या काळात आपल्या अधिकाऱ्यांना हे मंदिर पाडून टाकून तेथे मशीद बनव्ण्याचा आदेश दिला होता. मंदिर पूर्णपणे पाडले गेले नाही. मंदिरावर बसका घुमट व छोटे मनोरे चढवण्यात आले. मंदिरातील मूर्ति वा लिंग (बहुधा) इतरत्र हलवले गेले. मंदिराचा वापर बंद झाला पण मशीद म्हणूनहि त्याचा वापर सुरू झाला नाही. परिसरातच भूमिगत मंदिर बनले, त्याचीच नंतर अहिल्याबाई होळकर यांनी सुधारणा केली व ते अजूनही वापरात आहे. मूळ मंदिर तसेच पडून राहिले. पहिल्या दोन हल्ल्यांपेक्षां औरंगजेबाच्या सैन्याने मंदिराची खरी हानि केली म्हटले पाहिजे. ही परिस्थिति स्वातंत्र्य मिळेपर्यंत कायम होती.

सोमनाथ भाग ३

५. या महमुदाच्या स्वारीसंदर्भात एक वेगळीच कथा लेखिकेने सांगितली आहे. या भागात मुस्लिम वस्ती पुष्कळ होती. मात्र ते बहुतेक शिया, अहमदिया, सूफी असे होते. सुन्नी फरसे नव्हते. अरबस्तानामध्ये महंमदाच्या काळाच्या आधीपासून काबा व इतरही तीन देवतांची उपासना होत असे. काबाचा प्रभाव फारच असल्यामुळे महंमदालाही काबाचा स्वीकार करण्यावाचून पर्याय नव्हता. अजूनही काबाची उपासना होतेच. इतर तीन देवतानाही महंमदाने सुरवातीला काही काळ स्वीकारले होते. मात्र नंतर त्याने ती मान्यता सैतानाच्या प्रभावाखाली दिली होती असे म्हटले व त्यांना धिक्कारले! त्या देवतांची देवळे नष्ट होऊ लागली. त्यातील एका देवतेचे नाव मनात असे होते. असे म्हटले जाई कीं मनातची मूर्ति वाचवण्यासाठी भारतात आणली गेली तोच सोमनात वा सोमनाथ! हे अर्थातच खरे नाही पण मुस्लिम ग्रंथातून असे उल्लेख वारंवार सापडतात असे लेखिका म्हणते!
६. देउळ परिसराच्या उत्खननातून असे दिसून येते - लेखिका म्हणते - की महमुदाच्या स्वारीनंतर चालुक्य राजा भीमदेव पहिला याने जे मंदिर दुरुस्तीचे काम केले त्यायोगे मंदिराचा विस्तार झाला नाही. डागडुजी झाली. त्यामुळे मंदिर कालांतराने खराब होत गेले. मात्र त्याच्यावर पुन्हा हल्ला झाला नाही. आणखी एक चालुक्य राजा कुमारपाल याने हे मंदिर पुन्हा नव्याने बांधले व ते मूळच्या मंदिरापेक्षा मोठे झाले. १३व्या शतकात अल्लाउद्दिन खिलजीच्या स्वारीपर्यंत हे मदिर वापरात होते.
७. सौराष्ट्रातील हिंदु व मुस्लिम समाजामध्ये वैरभावना नव्हती व दोन्ही समाजांमध्ये सलोखा व व्यापार-व्यवहार चालू होते असे लेखिकेचे प्रतिपादन आहे. याचे एक स्पष्ट व ठळक उदाहरण लेखिकेने दिले आहे. एका श्रीमंत अरब व्यापारी व्यक्तीला सोमनाथमध्ये एक मशीद बांधावयाची होती. त्यासाठी सोमनाथ मंदिराच्या मालकीच्या जमिनींतून एक तुकडा सोमनाथाचा व्यवहार पाहणाऱ्या पंच मंडळीनी त्या व्यापाऱ्याला विकत दिला. त्याशिवाय आणखीहि जमीन त्याला विकत दिली जिच्या उत्पन्नातून त्या मशिदीची देखभाल व्हावयाची होती. हा व्यवहार वर्णन करणारा संस्कृत व अरबी भाषांतील शिलालेख सोमनाथ परिसरांत मिळालेला आहे.

Saturday, March 29, 2008

सोमनाथ भाग २

४. महमुदाच्या स्वारीचा मुख्य उद्देश लूट हा होता. धर्मप्रसार नव्हे. किंवा मूर्तिभंजन नव्हे.पूर्वापार स्थानिक व्यापारावरील कर, यात्रेकरूंवरील कर, राजाश्रय वगैरेमुळे यामुळे सोमनाथमंदिराला वैभव प्राप्त झाले होते व त्याची माहिती अरब व्यापारी लोकांकडून महमुदापर्यंत पोचली होती. या स्वारीची स्थानिक वा जैन लिखाणातील वर्णने वा शिलालेखांतील वर्णने भडक वा अतिरंजित नाहीत. हिंदुधर्मावरील घाला अशा स्वरूपाची वर्णने नाहीत. मुस्लिम लिखाणामध्ये मूर्ति फोडल्याचे उल्लेख आहेत. हे शिवालय असल्यामुळे येथे मूर्तीऐवजी शिवलिंग असावयास हवे. मूर्ती फोडल्यावर तिच्या पोटातून हिरेमाणके बाहेर पडली असे वर्णन आहे! हे सर्व उघडच अतिशयोक्त आहे. महमुदाचे महत्व अरबी तुर्की जगतात वाढवण्यासाठी ही अतिशयोक्त वर्णने केली गेली असावी. बगदाद्चा खलिफा व गझनीचा महमूद यांच्यात चुरस होती. महमुदाला पूर्वेकडील खलिफा म्हणवून घ्यायचे होते. अतिशयोक्त वर्णनांमागे अशी कारणे होती. स्थानिक लोकांच्या दृष्टीने ही इतरांप्रमाणेच एक स्वारी व लूट होती म्हणून त्याचे फारसे प्रतिसाद उमतले नाहीत.
महमूद परत गेल्यावर देऊळ पुन्हा दुरुस्त होऊन वापरातहि आले. देवळाच्या उत्पन्नाचे स्त्रोत चालूच राहिल्यामुळे मंदिराला पुन्हा पूर्ववैभवहि प्राप्त झाले.

Tuesday, March 25, 2008

सोमनाथ - भाग १

श्रीमती रोमिला थापर यांचे सोमनाथ या नावाचे इंग्रजी पुस्तक हल्लीच माझ्या वाचनात आले. लेखिका इतिहासतद्न्य म्हणून प्रख्यात आहे. पुस्तक खूप विस्तृत आहे व सोमनाथाच्या इतिहासाचे निरनिराळ्या दृष्टिकोनांतून विवेचन केले आहे. सोमनाथमंदिराच्या इतिहासाबद्दल कितीतरी नवीन माहिती वाचावयास मिळाली. सोमनाथ मंदिरावरील महंमद गझनीच्या स्वारीपासून ते स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मंदिर पुन्हा बांधले गेले या घटनेपर्यंत अनेक घटनांचा मागोवा पुस्तकांत घेतलेला आहे.
१. सोमनाथ हे मुळात तीर्थक्षेत्र म्हणून प्राचीन काळापासून मानले गेलेले होते. मात्र प्राचीन काळापासून येथे मोठे मंदिर होते व ते विख्यात होते असे नव्हे. मूळचे मंदिर लहानसे स्थानिक देऊळ असावे.
२. स्वातंत्र्य मिळाल्यावर जेव्हा येथे नवे मंदिर बांधावयाचे ठरले तेव्हा पुरातत्व खात्यातर्फे येथे उत्खनन केले गेले. त्यावेळी मिळालेल्या पुराव्यांवरून येथील पहिले देऊळ ९व्या वा १०व्या शतकातील होते. ते बहूधा मूळराजा या चालुक्य राजाने मूळच्या लहानशा स्थानिक देवळाचे जागी बांधले होते.
३.१०२६ साली गझनीच्या स्वारीच्या वेळी या मंदिराचा पूर्ण विध्वंस झाला अशी आपली समजूत असते ते खरे नाही. मंदिराला काही प्रमाणात हानि पोचली व लुटालूट झाली. मंदिराची मशीद बनली नाही. या स्वारीची वर्णने बहुतेक सर्व अरबी, इराणी, व तुर्की लेखकांची आहेत व तीं अतिशयोक्त आहेत.
यापुढील हकीगत पुढील भागांत. ....

Monday, March 24, 2008

ब्लॉगची ओळख

मला वाचनाची आवड पूर्वीपासून आहे. निवृत्तीनंतर तो विरंगुळा आहे. वाचलेल्या पुस्तकांबद्दल इतरांशी बोलायलाही मला आवडते. आता या ब्लॉगमधून मी आवडलेल्या पुस्तकांबद्दल तुमच्याशी बोलणार आहे.

www.Blogwani.com
Locations of visitors to this page