Thursday, April 3, 2008

सोमनाथ - भाग ५

मुस्लिम ग्रंथातील अतिशयोक्त वर्णनांवर विसंबून ब्रिटिश इतिहासकारानी व राज्यकर्त्यानी सोमनाथवरील स्वाऱ्यांना अवास्तव महत्व दिले. हिंदी स्थानिकांच्या लेखी फारसे महत्व नव्हते याची त्यानी दखल घेतली नाही. ब्रिटिशांना खरेच वाटले की महमुदाने सोमनाथमंदिराचे दरवाजे गझनीला नेले व नंतर ते महमुदाच्या कबरीला लावले गेले! भारतात इंग्रजी सत्ता स्थापन झाल्यावर ग. ज. लॉर्ड एलेन्बरॊ याने अफगाणिस्तानवर स्वारी केली होती. तिला फारसे यश मिळाले नव्हते. मात्र त्याने सैन्य परत आल्यावर असा जाहीरनामा काढला होता की आम्ही ते सोमनाथच्या देवळाचे दरवाजे जिंकून आणले आहेत व सोमनाथवरील हल्ल्यांचे उट्टे काढले आहे व हिंदुस्तानवरील कलंक पुसून टाकला आहे! या जाहीरनाम्याची भारतीय राजेरजवाड्यांनी वा हिंदु-मुस्लिम जनतेने मुळीच दखल घेतली नाही. प्रत्यक्षांत हे दरवाजे हिंदु बनावटीचे नव्हतेच. ते सोमनाथला कधीच पोहोचले नाहीत! ते आग्र्याला नेले असे म्हटले जाते. या अव्यापारेषु व्यापाराबद्दल ब्रिटिश पार्लमेंट मध्ये एलेन्बरोवर टीका झाली व त्याची थट्टा झाली!
स्वातंत्र्य मिळाल्यावर श्री. कन्हय्यालाल मुन्शी यांच्या जोरकस प्रयत्नांमुळे सोमनाथ मंदिराची पुन्हा बांधणी करण्याच्या मागणीला जोर आला. सरकारी पातळीवर हे करण्याला पं. नेहेरूंचा ठाम विरोध होता. एक स्वतंत्र ट्रस्ट त्यासाठी स्थापन झाला व त्याचेतर्फे देणग्या जमवून हे काम केले गेले. मात्र सौराष्ट्र सरकारने त्यासाठी पैसे खर्च केले. पं. नेहेरूना तेहि पसंत नव्हते पण त्यानी ते थांबवले नाही. राष्ट्रपति डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी उद घाटनाला जाऊ नये असा त्यांचा सल्ला होता. तो त्यांनी मानला नाही. निधर्मी राजवटीने यात भाग घेणे त्याना योग्य वाटत नव्हते. सरदार पटेलाना मंदिर बनवणे हवे होते पण सरकारी खर्च नको होता. त्यानी नेहेरूंवर दबाव आणला नाही. नव्याने बांधलेले हे मंदिर आता प्रवाशांचे आकर्षण झाले आहे.
लेखिकेचे एकूण मत सोमनाथवरील स्वाऱ्या हे हिंदु-मुसलमानांमधील वैराचे राष्ट्रीय पातळीवरील प्रतीक मानू नये व त्यांना अवास्तव महत्व देऊ नये असे दिसते. पुस्तकामध्ये लेखिकेचा या विषयाचा सखोल अभ्यास या वेगळ्या दृष्टिकोनाबरोबरच सहजच नजरेला येतो.

6 comments:

रवि आमले said...

नमस्कार फडणीस स‌ाहेब,
मराठीब्लॉग्जवर तुमचा हा ब्लॉग पाहिला आणि छान वाटलं.

होतं काय, की इतिहास आपल्यामागे असला, तरी त्याची पुस्तकं तर आपल्याच स‌मोर असतात. पण आपण म्हणजे असे असतो, की कशाला जातोय ती पुस्तकं वाचायला... आणि मग इतिहास म्हणून उगाचच नाही नाही त्या गोष्टींना कवटाळून बसतो.. त्यांचे देव्हारे माजवतो... बरे यातून काही चांगले घडावे, तर तेही नाही.

तुमच्यासारख्या अभ्यासकांच्या ब्लॉगमधून इतिहासावरची गैरसमजाची जळमटं दूर होण्यास मदतच होईल, असे वाटते. असो.
लगे रहो...

आपला,
विसोबा खेचर

प्रभाकर फडणीस P.K. Phadnis said...

नमस्कार विसोबाजी,
आपल्याला माझे लेखन आवडले हे वाचून आनंद झाला. धन्यवाद. आपल्या मित्रांनाहि या ब्लॉगबद्दल सांगा.

HAREKRISHNAJI said...

फडणीस काका,

आपल्या बॉगचा शोध लागला आणि एक खजीना गवसल्याचा आनंद हाती लागला.
माझे ही मत विसोबांसारखेच आहे. आपला बॉग वाचुन खुप विचार करायला लावतो.

प्रभाकर फडणीस P.K. Phadnis said...

हरेकृष्णजी,
आपल्यासारख्या तरुण पिढीच्या वाचकालाही माझे लेखन आवडले याचा मला विषेश आनंद वाटला. आता नवीन विषयांवर लिहायला मला हुरूप आला आहे. आपल्या मित्रांनाहि या ब्लॉगबद्दल जरूर सांगा. धन्यवाद.

xetropulsar said...

काका,

आपल्या बाकी दोन ब्लॉगचे काय झाले? 'सोबती' वर गुगलने टाळे ठोकले आहे. का बुआ?

अमित

प्रभाकर फडणीस P.K. Phadnis said...

अमित,
माझे मला कळेना, कां ब्लॉग हा रुचेना?
माझे दोन ब्लॉग गूगलने कां बंद केले हे मलाच कळत नाही! मी नवखा असल्यामुळे अनवधानाने काही चूक झाली असावी. मी अपील केले आहे. पाहूया न्याय मिळतो का.
जाहल्या काही चुका अन ब्लॉग माझे थांबले ..

www.Blogwani.com
Locations of visitors to this page