Saturday, April 12, 2008

अयोध्या विवाद

अयोध्या विवाद – लेखक श्री. शेखर सोनाळकर
बाबरी मशीद पाडली गेल्यानंतर हे पुस्तक प्रसिद्ध झाले. हा विषय तसा वादग्रस्त आहे. लेखकाने खूप मेहेनतीने अनेक पुस्तकांचा उत्खनन अहवालांचा ऐतिहासिक संदर्भांचा तपशीलवार अभ्यास केलेला दिसून येतो. पूर्वी अस्तित्वात असलेले राममंदिर उध्वस्त करून बाबराने ही मशीद बांधली होती काय याबद्दल लेखकाने मत दिले आहे की मशिदीच्या जागी आधी मंदिर असल्याचा पुरावा मिळालेला नाही. हे मत पटणे वा न पटणे व्यक्तिगत राहील. या जागी रामाचे जन्मस्थळ होते काय हा तर श्रद्धेचा भाग आहे. पण मंदिर पाडून मशीद बांधली गेली काय हा वस्तुनिष्ठ पुराव्यांचा विषय आहे. लेखकाने मांडलेले मुद्दे निकोप मनाने विचारात घेण्यास हरकत नसावी. या विचाराने पुस्तकातील काही माहिती आपणासमोर मांडली आहे.
१ रामायणाच्या उत्तरकांडातील एका उल्लेखाप्रमाणे अयोध्येपाशी शरयू नदी पश्चिमवाहिनी होती. प्रत्यक्षात ती तेथे उत्तरेला व मग वळण घेऊन पूर्वेला जाते. नेपाळातील शरयूचा काही भाग पश्चिमवाही आहे. मग रामायणकाळी अयोध्या नेपाळात होती काय?
२. बाबर प्रत्यक्षात अयोध्येपर्यंत आला होता काय याबद्दल शंकेला जागा आहे. बाबरनामा मुळात तुर्की भाषेत लिहिलेला होता. त्याच्या भाषांतरावरून इंग्रजीत भाषांतरे झाली. भारताच्या पूर्व भागात अफगाणांची सत्ता होती. त्याच्यावर बाबर चालून आला. या युद्धाच्या कालखंडातील बाबरनाम्यातील काही पाने गहाळ आहेत. मात्र एका इंग्रज महिलेने मूळ तुर्की ग्रंथ वाचून असे मत दिलेले आहे की बाबराचा तळ अयोध्येपासून ७०-८० मैलांवर ’अवध राज्याच्या सीमेवर’ पडला होता. अफगाणांशी युद्ध तेथेच झाले व पावसाळा आल्यामुळे बाबर तेथूनच आग्र्याला परत गेला. अयोध्येपर्यंत आलाच नाही.
२ मशिदीवरील ज्या शिलालेखांवरून बाबराने ही मशीद बांधली अशी समजूत होती ते शिलालेख खूप नंतरचे होते. त्यांच्यांत औरंबजेबाचा उल्लेख आहे व भाषा, वळण बाबरकालीन नाही.
४. बाबरी मशिदीचे बांधकाम ’जौनपूर’ पद्धतीचे आहे (होते). या प्रकारच्या अनेक मशिदी बाबरापूर्वी अफगाण अमलात त्या भागात बांधलेल्या होत्या. त्यातीलच ही एक.
५. मशिदीच्या भिंतीत काही दगडी खांब होते ते मुसलमानी वळणाचे नव्हते. पण ते फक्त सहा फूट उंच व भिंतीत नुसतेच बसवलेले होते.त्यांच्यावर भिंतीचे वा छ्ताचे वजन नव्हते. सहा फुटी खांब ’भव्य’ मंदिराचे अवशेष म्हणणे सयुक्तिक नाही.
६. मशिदीभोवती ब्रिटिश काळात भिंत बांधली गेली. तिच्या बाहेर एक चबुतरा रामजन्मस्थळ म्हणून मानला जात असे. हा श्रद्धेचा भाग खरा पण रामाचा जन्म अयोध्येत कौसल्येच्या म्हणून म्हटल्या जाणाऱ्या महालापासून खूप दूर या चबुतऱ्याच्या जागी कां झाला असेल?
हे काही मुद्दे वानगीदाखल दिले आहेत. उत्सुकता असणारानी मूळ पुस्तक वाचावे. बाबरी मशीद आता पाडली गेली आहे. त्या सर्व जागेचे ’पद्धतशीर’ उत्खनन कधी काळी झाले तर तेथे पूर्वी विक्रमादित्याने बांधलेले भव्य राममंदिर होते काय याचा उलगडा होऊ शकेल. मात्र कित्येक वर्षे हे होणे शक्य दिसत नाही. तेव्हा हा विषय संपलेला आहे.

Monday, April 7, 2008

विविध कॅलेंडरे भाग - २

५ मुसलमानांची कालगणना चांद्रवर्षानुरूप होते. वर्षाचे बारा चांद्रमास असतात व त्याना नावे आहेत. महिने शुक्ल प्रतिपदेला सुरू होतात. हिंदु-ज्यू कालगणनेपेक्षा मुख्य व महत्वाचा फरक म्हणजे सौरवर्ष व चांद्रवर्ष यांतील सुमारे ११ दिवसांचा फरक जुळवून घेण्यासाठी अधिक महिना वा इतर काही व्यवस्था नाही. बारा चांद्र महिने संपले की नवीन वर्ष सुरू! त्यामुळे वर्षारंभ व इतर सण वा उपासना दिवस दर वर्षी मागेमागे येतात. दर ३३ वर्षानी गाडी पुन्हा मूळपदावर येते. इस्लामच्या उदयापूर्वी अरबस्तानात ज्यूंची कालगणनाच होती. तेव्हाचे प्रचारातील आदिवासी वा ज्यू सणवार ऋतुचक्राशी निगडित होते. असे वाचनात आले की या सणांचा इस्लाम धर्मीयांवर पगडा राहू नये यासाठी महंमद पैगंबराने अधिकमासाची पद्धत जाणीवपूर्वकच बंद केली. त्यामुळे जुने सणवार लोक विसरले. हिजरी सन व इसवी सन याचे एकास एक असे नाते राहत नसल्यामुळे इतिहास संशोधकाना त्याची कोष्टके बनवून काळजीपूर्वक वापरावी लागतात!
६. आज जगात मुख्यत्वे वापरात असलेले कॅलेंडर म्हणजे इसवी सन. ख्रिस्तजन्मापासून याची सुरवात मानली जाते पण त्याची खात्री देता येत नाही. ही कालगणना पूर्णपणे सौरवर्षाची आहे. महिन्यांचाहि चंद्राशी काही संबंध नाही. वर्षाचे ३६५ दिवस बारा महिन्यांमध्ये कमीजास्त वाटलेले आहेत. मात्र ३-३ महिन्यांत ते साधारण सारखे आहेत. प्रत्यक्षात ही कालगणना ज्युलियस सीझरने ख्रिस्तापूर्वी ४५ वर्षे आधी सुरू केली तेव्हा त्याला ज्युलियन कॅलेंडर नाव होते. वर्षाचे ३६५ दिवस होते. लीप इयरचीहि पद्धत होती मात्र लीप इयर दर तीन वर्षानी घेतले जाई. इ. स. ३६ पर्यंत यामुळे जादा दिवस मोजले गेल्याचे स्पष्ट झाले. तेव्हा रोमन राजा ऑगस्टस याने ती दुरुस्त केली, जादा मोजलेले दिवस गाळले व लीप इयर ४ वर्षानी येऊ लागले. मात्र १००, २००, ३०० ही वर्षेहि लीप इयर मोजली गेल्यामुळे इ. स. १५८२ पर्यंत दहा दिवस जादा मोजले गेले होते असे दिसून आले. म्हणून पोप ग्रेगरी याने त्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात असा फतवा काढला की ऑक्टोबर महिन्यात ४ तारखेनंतर दहा दिवस गाळावे व एकदम १५ तारीख घ्यावी. तसेच शतकाचे शेवटचे वर्ष लीप इयर घेऊ नये पण १६००, २००० ही वर्षे लीप इयर घ्यावी. तेव्हापासून हाच नियम लीप इयर बद्दल वापरला जातो. या सुधारणेनंतर या कॅलेंडरचे नाव ग्रेगेरियन कॅलेंडर असे पडले.
७. पोपचा फतवा त्याच्या अमलाखालील कॅथॉलिक राष्ट्रांनी लगेच अमलांत आणला. ब्रिटन, स्वीडन या प्रॉटेस्टंट राष्ट्रांनी मात्र १७० वर्षांनंतर १७५२-५३ मध्ये हा बदल केला. रशिया, ग्रीस ही राष्ट्रे कॅथॉलिक खरी पण त्यांचे ग्रीक चर्च हे पोपच्या लॅटिन चर्चपेक्षा वेगळे त्यामुळे रशियाने कम्युनिस्ट राज्यक्रांतीपर्यंत हा बदल केला नव्हता. तथाकथित ऑक्टोबर क्रांति प्रत्यक्षात नोव्हेंबरमध्ये झाली! ग्रीसने तर १९२३ मध्ये हा बदल अमलात आणला. युरोपातील या तथाकथित पुरोगामी राष्ट्रांनी हा आवश्यक बदल स्वीकारण्यास एवढा दीर्घ काळ घेतला.
८. पारशी धर्म व संस्कृति ही फार प्राचीन. त्यांची कालगणना आणखीनच गोंधळाची आहे. शिवाय इराणातील उरलेले पारशी व भारतातील पारशी यांच्यातहि फरक आहे. फसली, कदमी व शहेनशाही अशी तीन कॅलेंडरे त्यांच्यात प्रचारात आहेत. फसली पद्धतीप्रमाणे ३०दिवसांच्या १२ महिन्यांचे वर्ष होते. शेवटच्या महिन्यानंतर ५ किंवा लीप इयरच्या वर्षी ६ जादा बिननावाचे दिवस जोडले जातात. वर्षाची सुरवात वसंतसंपाताच्या दिवशी २३ मार्चला होते. संपात दिवस थोडाथॊडा मागे येत असल्याने तो एक दिवस मागे येईल तेव्हा बहुधा ते एक दिवस गाळतील! वर्षारंभ वसंतसंपाताला घेणे हे शास्त्रशुद्ध आहे. ग्रेगेरियन कॅलेंडरमध्येहि १ जानेवारीला वर्षारंभ करण्यापेक्षा वसंतसंपातापासून करणे योग्य होईल. पण हा बदल आता कठीण आहे! ही पद्धत भारतातील एका विद्वान पारशाने सुचवली व इराणात ती अमलात आली पण भारतातील पारशांनी ती स्वीकारलेली नाही! त्यांच्या इतर दोन पद्धती मला नीटशा कळल्याच नाहीत.
९. जगातील बहुतेक सर्व जुन्या संस्कृतींनी चांद्रवर्षावर आधारलेली कालगणना वापरली. यांत नवल नाही. काळाचे दिवस व वर्ष हे दोन मापक नॆसर्गिक आहेत. त्याचे मधले माप हे अमावास्या ते अमावास्या या सहज कळणाऱ्या नैसर्गिक घटनेशी निगडित असणे साहजिक आहे. मात्र चांद्र महिने व वर्ष यांची सांगड घालणे सोपे नसल्यामुळे त्याबाबत फरक पडलेले आहेत.

विविध कॅलेंडरे - भाग १

विविध धर्मी लोकांच्या वर्षगणनेची देत असलेली माहिती कोणा एकाच पुस्तकावरून दिलेली नाही. निरनिराळ्या वेब-साइट्स वरून ती जमा केलेली आहे. त्यामुळे लेखकाचे नाव देता येत नाही. क्षमस्व!
१. हिंदु कॅलेंडरे चांद्रमासावर आधारलेली असतात. दिवस सूर्योदयापासून सुरू होतो. सूर्यॊदयाचे वेळी चंद्राची जी तिथि चालू असेल ती त्या दिवसाची तिथि असते. त्यामुळे कलकत्त्याचे व मुंबईचे पंचांग एकाच तारखेला वेगळ्या तिथि दाखवू शकेल. मुंबईत व अमेरिकेत नक्कीच!
२. ज्यू लोकांचे कॅलेंडरहि काहीसे चांद्रगणनेवर आधारलेले आहे. ज्यूंचा दिवस मात्र सूर्यास्तापासून सुरू होतो. हिंदूंचा आठवडा सात दिवसांचा व प्रत्येक दिवसाला सोम-मंगळ अशी नावे आहेत. ज्यूंचाहि सात दिवसांचा सप्ताह असतो. पण पहिल्या सहा दिवसाना नावेच नाहीत. पहिला - दुसरा असे म्हणावयाचे. सातव्याचे नाव शब्बाथ. तो हिंदूंचा (बहुधा) रविवार.
३. ज्यूंचे वर्ष बारा महिन्यांचे. महिन्यांचे दिवस ३० व २९ आलटून पालटून येतात. मात्र आठवा व नववा महिना कधी २९ व कधी ३० दिवसांचा. त्याचे नियम क्लिष्ट आहेत. त्यामुळे वर्षाचे दिवस ३५३, ३५४ वा ३५५ कोणतेही असतात.
४. हिंदूंचे वर्ष १२ चांद्र महिन्यांचे व सौर वर्षाशी जुळवून घेण्यासाठी २८-२९ महिन्यांनंतर एक अधिक महिना येतो. त्याबद्दलचा नियम सूर्याच्या राशिसंक्रमणाशी जोडलेला व सुस्पष्ट आहे. ज्यू लोकहि अधिक महिना घेतात. मात्र त्याचे नियम वेगळे आहेत. दर १९ वर्षांच्या चक्रामध्ये ३,६,८,११,१४,१७ व १९ ही वर्षे अधिक महिन्याची. हा अधिक महिना दर वेळेला ११व्या महिन्यानंतरच येतॊ व तो ३० दिवसांचा असतो. बाराव्या महिन्याचे नाव अडार असे आहे. अधिक महिन्याचे नाव अडार-१ असे होते व बारावा महिना त्या वर्षी अडार-२ असे नाव घेतो. हिंदूंमध्येहि अधिक चैत्र व निज चैत्र असे म्हणतात.
५. हिंदु महिने नेहेमी शुक्लप्रतिपदेला (उत्तर भारतात कृष्णप्रतिपदेला) सुरू होतात. ज्यूंचे वर्ष (पहिला महिना) प्रतिपदेला सुरू होते. मात्र महिन्यांचे दिवस ३० वा २९ ठरलेल्या क्रमाने येत असल्यामुळे इतर महिन्यांची सुरवात प्रतिपदेला होतेच असे नाही. सर्व सणवार, उपासना दिवस त्यांच्या विशिष्ट महिन्याशी व दिवसाशी निगडित असतात.
इतर कालगणनांची माहिती पुढील भागात.

Thursday, April 3, 2008

सोमनाथ - भाग ५

मुस्लिम ग्रंथातील अतिशयोक्त वर्णनांवर विसंबून ब्रिटिश इतिहासकारानी व राज्यकर्त्यानी सोमनाथवरील स्वाऱ्यांना अवास्तव महत्व दिले. हिंदी स्थानिकांच्या लेखी फारसे महत्व नव्हते याची त्यानी दखल घेतली नाही. ब्रिटिशांना खरेच वाटले की महमुदाने सोमनाथमंदिराचे दरवाजे गझनीला नेले व नंतर ते महमुदाच्या कबरीला लावले गेले! भारतात इंग्रजी सत्ता स्थापन झाल्यावर ग. ज. लॉर्ड एलेन्बरॊ याने अफगाणिस्तानवर स्वारी केली होती. तिला फारसे यश मिळाले नव्हते. मात्र त्याने सैन्य परत आल्यावर असा जाहीरनामा काढला होता की आम्ही ते सोमनाथच्या देवळाचे दरवाजे जिंकून आणले आहेत व सोमनाथवरील हल्ल्यांचे उट्टे काढले आहे व हिंदुस्तानवरील कलंक पुसून टाकला आहे! या जाहीरनाम्याची भारतीय राजेरजवाड्यांनी वा हिंदु-मुस्लिम जनतेने मुळीच दखल घेतली नाही. प्रत्यक्षांत हे दरवाजे हिंदु बनावटीचे नव्हतेच. ते सोमनाथला कधीच पोहोचले नाहीत! ते आग्र्याला नेले असे म्हटले जाते. या अव्यापारेषु व्यापाराबद्दल ब्रिटिश पार्लमेंट मध्ये एलेन्बरोवर टीका झाली व त्याची थट्टा झाली!
स्वातंत्र्य मिळाल्यावर श्री. कन्हय्यालाल मुन्शी यांच्या जोरकस प्रयत्नांमुळे सोमनाथ मंदिराची पुन्हा बांधणी करण्याच्या मागणीला जोर आला. सरकारी पातळीवर हे करण्याला पं. नेहेरूंचा ठाम विरोध होता. एक स्वतंत्र ट्रस्ट त्यासाठी स्थापन झाला व त्याचेतर्फे देणग्या जमवून हे काम केले गेले. मात्र सौराष्ट्र सरकारने त्यासाठी पैसे खर्च केले. पं. नेहेरूना तेहि पसंत नव्हते पण त्यानी ते थांबवले नाही. राष्ट्रपति डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी उद घाटनाला जाऊ नये असा त्यांचा सल्ला होता. तो त्यांनी मानला नाही. निधर्मी राजवटीने यात भाग घेणे त्याना योग्य वाटत नव्हते. सरदार पटेलाना मंदिर बनवणे हवे होते पण सरकारी खर्च नको होता. त्यानी नेहेरूंवर दबाव आणला नाही. नव्याने बांधलेले हे मंदिर आता प्रवाशांचे आकर्षण झाले आहे.
लेखिकेचे एकूण मत सोमनाथवरील स्वाऱ्या हे हिंदु-मुसलमानांमधील वैराचे राष्ट्रीय पातळीवरील प्रतीक मानू नये व त्यांना अवास्तव महत्व देऊ नये असे दिसते. पुस्तकामध्ये लेखिकेचा या विषयाचा सखोल अभ्यास या वेगळ्या दृष्टिकोनाबरोबरच सहजच नजरेला येतो.

www.Blogwani.com
Locations of visitors to this page